Ticker

10/recent/ticker-posts

आगीबाबत नागरिकांनीही सजग होणे गरजेचे

आगीबाबत नागरिकांनीही सजग होणे गरजेचे
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लाख मोलाचे जीव जाताहेत, आणि करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही अग्नि सुरक्षा कायद्याच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या मुंबईत दिसून येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नी सुरक्षा कायद्यानुसार कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र, त्याचे उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर येत आहे. उपहार गृहे आणि शॉपिंग सेंटरमध्ये फक्त पैशांसाठी जीवाशी खेळ केल्याचे एकूणच चित्र समोर येत आहे.

प्रत्येक ठिकाणी अग्निप्रतिबंधक यंत्रणा कुचकामी ठरत आहे. बहुमजली इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा असणे बंधनकारक आहे. या यंत्रणेची चाचणी दर सहा महिन्यांनी करणे आवश्यक आहे. तसेच ही यंत्रणा वापरण्याचा अनुभव असलेले सुरक्षारक्षक असणे बंधनकारक आहे. मात्र, यातील एकही नियम पाळला जात नाही. अनेक वेळा इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा ही योग्य पद्धतीने काम करत नाही बहुमजली इमारती उपहारगृहात आगीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र असणे बंधनकारक आहे यात कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये असा नियम आहे. पण, अनेक वेळा यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार अडगळीचे सामान आणून ठेवले जात आहे परिणामी जिन्याचा मार्ग अडवला जातो.

उपहारगृहातील सिलिंडर प्रामुख्याने इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असावेत, पाईप मधून स्वयंपाक घरातील गॅस पुरवठा जावा असा नियम आहे. मात्र, अनेकदा सिलेंडर स्वयंपाक घरातच असतात. सिलेंडरच्या साठयानुसार कशा प्रकारची प्रतिबंधक यंत्रणा असावी याचेही नियम असतात. मात्र, आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध असल्यास ती कशी हाताळावी याचे ज्ञान तेथे असलेल्या व्यक्तींना नसते. उपहार गृह आणि खानावळीच्या स्वयंपाक घरात खाद्य पदार्थ बनविणाऱ्या कामगारांना झोपायला देऊ नये. असा पालिकेचा नियम आहे. त्याच नियमावर परवानगी दिली जाते. मात्र, बऱ्याचशा छोट्या-मोठया कारखान्यात लागलेल्या आगीत याआधी तो नियम पाळला गेला नाही. परिणामी, काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सिलेंडर, डिझेल, खाद्यतेल आदी ज्वलनशील साहित्याचा साठा असलेल्या कारखान्यात कामगार झोपत असल्याचेही याआधी उघड झालेले आहे.

अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासन सर्व संबंधित अशा दुर्घटनांना जबाबदार आहेत. पण, केवळ  या सर्वांना जबाबदार धरून आगीचा प्रश्न सुटणार नाही, तर यावर कोणता उपाय केला पाहिजे याचाही सर्वंकष विचार होणे गरजेचे आहे. रहिवासी किंवा नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आधीच्या दुर्घटना टाळण्यासाठीच्या सुरक्षा उपायांबाबतची माहिती रस्तोरस्ती लावले जाणारे फलक, वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी या माध्यमातून सरकारी जाहिराती, इलेक्ट्रिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती अशी माहिती एकत्रित करून नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिकल उपकरण यांविषयी कोणती काळजी घ्यायची, आयएसआय मार्क उपकरणांवर कुठे असतो? तो कसा पाहायचा? इलेक्ट्रिशन किंवा वायरमन जेव्हा नवा असतो तेव्हा त्याच्याकडे आवश्यक तो परवाना आहे की नाही, याची खात्री कशी करून घ्यायची? हा परवाना दिसतो कसा? इमारतीत सदनिका घेताना अग्निरोधक उपकरण कोणती आणि कुठे बसवली जातात? तसेच इमारतीला रेफ्युज फ्लोअर आहे की नाही, तो किती उंचीचा असतो? अग्नि सुरक्षा यंत्रणा कोणत्या असतात? त्या कशा वापरायच्या? आपल्या ऑफिसमध्ये अग्नि सुरक्षा यंत्रणा बसवलेली आहे, किंवा नाही आणि आपण खाण्यासाठी जात असलेल्या हॉटेलला एकच दरवाजा आहे का, तिथे अग्नि सुरक्षा यंत्रणा बसविल्याचा बोर्ड दर्शनी भागात आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींबाबत सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. ती एकदा का मनावर बिंबवली गेली की मग नागरिकांमध्ये या विषयाबद्दल गांभीर्य निर्माण होईल आणि त्यातून या गोष्टींबाबत काळजी कोणती घ्यायची हे कळलं तर लोक आवश्यक ती खबरदारी नक्कीच घेतील.

एकदा का नागरिकांमध्ये जनजागृती झाली की, अग्निसुरक्षेबाबत सजगता येईल आणि मग प्रसारमाध्यमे आणि नागरिकांच्या वाढलेल्या दबावापुढे सरकार आणि बिल्डर, पबमालक, हॉटेलमालक, इलेक्ट्रिकल कंत्राटदार यांना अग्निसुरक्षेबाबतच्या गोष्टींची पूर्तता करणे भाग पडेल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या