दहशतवाद : परिणामकारक कृती हवी
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. ४० भारतीय जवान यामध्ये शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे. अशा भावना व्यक्त होत आहे. किती काळ सहन करायचे, असा प्रश्न प्रत्येक भारतवासी विचारत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकदा आपण युद्ध जाहीर करावे, त्यांना त्यांच्या देशात जाऊन त्यांना मारावे, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे; पण मुळात असे लगेच काही करण्याची आवश्यकता नसते. योग्य पद्धतीने आणि पूर्ण नियोजन करूनच कारवाई केली पाहिजे. ती करत असताना निरपराध सर्वसामान्य लोकांना त्याची झळ बसता कामा नये याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे.
आपल्या सैनिकांवर हल्ले होत आहेत. दहशतवादी संघटना असे हल्ले वारंवार घडून आणत आहेत. या संघटनेनं कोणाची फूस आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दरवेळी सीमेपलीकडून घुसखोरी करून जवानांचे आणि निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या जशास तसे उत्तर योग्य तयारीनिशी देणे गरजेचे आहे. कारण एकाएकी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारणे हा आततायीपणा ठरेल. कारण यामुळे दोन्ही देशांचे अतोनात नुकसान होईल. त्यामुळे उरीवरील हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राइक केला होता तशा प्रकारे पाऊल उचलावे लागेल. भारतीय सेना आणि केंद्र सरकार योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन दहशतवाद्यांचा बिमोड नक्की करील.
यासोबतच ज्या तयारीने भारतीय लष्करी वाहनांच्या ताफ्यावर हल्ला हल्ला करण्यात आला तो पाहता स्थानिक मदतीशिवाय करणे केवळ अशक्य आहे. एवढी प्रचंड स्फोटके मिळविणे , ती साठवून ठेवणे आणि संपूर्ण हल्ल्याची योजना आखणे आणि तडीला नेणे हे साधे व एका व्यक्तीचे काम नाही.
2 टिप्पण्या
लेख छान लिहिला आहे.👌
उत्तर द्याहटवाchintan karne garjeche.
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.