Ticker

10/recent/ticker-posts

घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ

नोकरी संसार सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडेही आपण दुर्लक्ष करत आहोत हे महिलांनी विसरता कामा नये...

-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)

मी बाई आहे सारखे सारखे आजारी पडून कसं चालेल?? माझ्या नवऱ्याला रोज सकाळी डबा कोण बनवून देणार? माझ्या लहान मुलाला कोण सांभाळणार..? अशी एकंदरीत विचारसरणी महिलांच्या मनात दडलेली असते. प्रत्येक महिलेला वाटत असते की, आपण आजारी पडायला नको. नाहीतर या सगळ्यांचे हाल होतील. आणि हेच कारण  अनारोग्याचे मूळ बनते. ती महिला वेळीच आरोग्य सेवेपर्यंत पोहोचत नाही, आणि केव्हा कोलमडून पडते याचे तिलाही भान राहत नाही. मग दोष द्यायचा तरी कोणाला?


स्वतःच्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष. सगळया स्त्रियांमध्ये आढळणारा हा एक समान गुण. गृहिणी स्वतः लक्ष देत नाही म्हटल्यावर घरातले इतरही तिची काळजी घेत नाही. आणि मग इथूनच सुरू झालेले आजार उतारवयापर्यंत आपले पाय घट्ट रोवतात.


आजकल धावपळीत प्रत्येकजण इतका अडकून गेला आहे की, आपल्या आरोग्यासाठी वेगळा वेळ देणे कठीण होऊन गेले आहे. प्रत्येकाने आपल्या शरीराचं आरोग्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे नाहीतर आपलं मन कदापि खंबीर आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही, असा गौतम बुद्धांनी म्हटलंय.  या त्यांच्या संदेशाचे थोडे आत्मचिंतन केल्यावर लक्षात आले की, आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य बाबतही किती निष्काळजीपणा दाखवतो.


कधीकधी थोडी- थोडी दुखणारी पाठ, कंबर, डोकं याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर कधी दिवसागणिक वाढत चाललेल्या या नॉर्मल आजाराकडे दुर्लक्ष करण्याची आपण चूक करतो. थोडक्यात आपण आपल्या शरीराला काय पाहिजे हे गृहीत धरत नाही. मग, एक दिवस हेच शरीर दुर्धर आजारपणामुळे बंड करुन उठते आणि आपले सगळे व्यवहार ठप्प करून टाकते. परिणामी, सक्तीने विश्रांती घेण्याशिवाय आपल्या समोर काहीच पर्याय उरत नाही. डॉक्टरांची अव्वाच्या सव्वा बिले पाहून तर चक्कर यायची वेळ येते. कामाच्या धबडग्यात आजकाल प्रत्येक वेळी थोडंसं काही दुखलं-खुपलं की लगेच डॉक्टरकडे धावता येत नाही. कधी- कधी वेळेअभावी तर कधी घरच्या घरी घरगुती उपचारांवर आपला अधिक विश्वास असल्याने आपण योग्य उपचारांना टाळण्याचाच प्रयत्न करतो.


बऱ्याचदा काही गंभीर आजारांचे निदान केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे येते. काही प्रसंगात तर वेळही आपल्या हातून निघून गेलेली असते. स्त्रियांमध्ये वयोमानानुसार अनेक बदल घडत असतात. त्यामुळे योग्य वेळी सावधपणा दाखवून जरुरी असलेले उपचार करून घेण्यातच शहाणपण आहे. आपल्याकडे स्त्रियांमध्ये थायरॉईड, कर्करोग, स्तनांचा कर्करोग, मासिक पाळीच्या समस्या, लठ्ठपणा, रक्ताची कमतरता, आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता हे सर्वसाधारणपणे आढळणारे आजार आहेत. त्यातले काही जीवघेणेही आहेत. त्यामुळे ठराविक वेळेनंतर आणि विशेषतः लग्न करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा नियम प्रत्येकीने स्वतःहून स्वतः साठी  बनवून घ्यायला हवा.


घरातल्या इतर सदस्यांची काळजी घेताना आपली नोकरी संसार सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडेही आपण दुर्लक्ष करत आहोत हे महिलांनी विसरता कामा नये. घरातली स्त्री सुदृढ असेल तर घरही सुदृढ होईल.



टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. छान लेख, लेखात म्हटल्याप्रमाणे घरातील स्त्री निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी, सुदृढ राहील यात शंकाच नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. घरातली महिला निरोगी असेल तर संपूर्ण घर निरोगी राहील हे सत्य आहे. .

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.