Ticker

10/recent/ticker-posts

सुवर्ण स्वप्न साकार झाले

ज्या क्षणाकडे देशातील १४० कोटी जनता आतुरतेने डोळे लावून बसली होती, तो क्षण अखेर शनिवारी आला. भारताचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी भालाफेक करून सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आणि १४० कोटी जनतेचे सुवर्ण स्वप्न साकार केले. नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा ऑलिम्पिकमधील सुवर्ण दुष्काळ संपवला.


ऑलम्पिकमध्ये भारताचे केवळ दुसरेच हे सुवर्णपदक आहे. याआधी अभिनव बिंद्रा याने २००८ साली बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे ॲथलेटिक्समध्ये भारताला मिळालेले हे पहिलेच पदक आहे. याआधी मिल्खासिंग, पी टी उषा हे पदकाच्या जवळ पोहोचूनही पदकाला गवसणी घालू शकले नव्हते. ती किमया निरजने करून दाखवली. याबद्दल नीरज चोप्राचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.


भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राचा जन्म २७ डिसेंबर १९९७ ला हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे शिक्षण चंदिगड येथे झाले. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड होती. त्याचे वजन ८० किलो होते. त्यामुळे गावातील लोक त्याला सरपंच म्हणत. कुस्ती, कबड्डी असे खेळ त्या गावातील मुले खेळत. पण, निरजने मात्र भालाफेक खेळाची निवड केली. विशेष म्हणजे त्याच्या गावात कोणीही भालाफेक हा खेळ खेळत नव्हते.


भालाफेक हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जातो हे देखील त्या गावातील काही लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे अनेकांनी त्याला भालाफेक सोडून कुस्ती हा खेळ खेळायला सांगितले. नीरजने मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून भाला फेकीतच करिअर करायचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करायचे असा निश्चय केला. त्यासाठी त्याने तंदुरुस्तीवर भर दिला. खूप प्रयत्न करून स्वतःचे वजन कमी केले. भालाफेकीचा दररोज सराव केला. खेळात सातत्य ठेवले आणि दिवसेंदिवस चांगली कामगिरी केली.


राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने २०१६ साली दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय पथकात निरजची निवड झाली. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या २० वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ८४.४८ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळविले. अंजू बॉबी जॉर्जनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये भारताला पदक मिळवून देणारा नीरज हा दुसराच भारतीय खेळाडू ठरला होता.


एकाच वर्षात दोन महत्त्वाच्या  स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने त्याचे  जगभर नाव झाले. या कामगिरीनंतर निरजची भारतीय सेनेत जूनियर कंडीशन ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली.


२०२० चाली जगभर कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे त्याच्या ऑलम्पिक तयारीवरही मोठा परिणाम झाला. असे असतानाही या ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून द्यायचेच या निश्चयाने तो मैदानात उतरला. पहिल्या प्रयत्नातच त्याने ८७.०३ मीटरवर भाला फेकून आघाडी मिळवली. दुसऱ्या प्रयत्नात निरजने ८७.५८ मीटर भाला फेकत पहिल्या प्रयत्नाच्या तुलनेत सुधारणा केली. तिसऱ्या प्रयत्नात निरजचा ७६.७९ मीटर अंतरावर गेला.  त्याचा चौथा आणि पाचवा प्रयत्न मात्र अवैध ठरला. मात्र, बाकी स्पर्धकांची कामगिरी सर्वसाधारण राहिली त्यामुळे निरजची आघाडी कायम राहिली. सहाव्या प्रयत्नात निरजने ८४.२४  अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचे सुवर्ण पदक निश्चित झाले आणि देशवासीयांनी दिवाळी साजरी केली. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


देशातील १४० कोटी जनतेचे स्वप्न साकार करण्यऱ्या निरजचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. नीरज चोप्राने टोक्योमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला.





















Photo : google 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या