Ticker

10/recent/ticker-posts

मुंबईला गरज पर्यायी व्यवस्थेची

मुंबईला गरज पर्यायी व्यवस्थेची
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अपुरा पाणीसाठा असल्यामुळे पिण्याचे पाणी संपत चालले असून उन्हाळ्यात मुंबईकरांना दरवर्षी पाऊस पडेपर्यंत पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पाण्याचे नियोजन करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. झोपडपट्टीतून जलवाहिन्या फोडून पाणीचोरी केली जाते. अनधिकृत बांधकामे भू-माफियांकडूनही पाण्याची राजरोसपणे चोरी सुरू आहे. चाळी व आरसीसी बांधकामांना लागणारे पाणी पालिकेच्या अधिकृत जलवाहिनीतून चोरून घेतले जाते. करदात्या नागरिकांना मात्र पाणीटंचाईमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

  • पाणीचोरीकडे महापालिका अधिकारी लक्ष न देता भाडेकरूंना पाणी बिलात वाढ करून दिली जाते. मोठी थकबाकी असलेल्यांना सवलत दिली जाते. फेरीवाले, झोपडपट्टीत राहणारे पाण्याची लाईन फोडून पाण्याची चोरी करतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तर पाईपलाईन खोदून बेकायदेशीर नळजोडणी घेतली जाते. त्याकरिता पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाणीचोरी व रस्त्यावर होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गळती रोखण्याकरिता २४ तास लक्ष घालणे गरजेचे आहे. 
मुंबई महानगरपालिकेकडे धरणांशिवाय पिण्याच्या पाण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था मुंबकरांकरिता नाही. मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे साडेतीन हजार विहिरी असल्याचा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांचा अंदाज आहे. वाढत्या विकासामुळे शहर आणि उपनगरांतील विहिरीवर अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणी विहिरी बुजवण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे त्यांचा वापर न झाल्यामुळे त्या विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे. जर विहिरींचा सातत्याने वापर होत राहिल्यास पाणी खेळते राहील. परिणामी, ते वापरण्यात योग्य राहिल. एखाद्या वर्षी पाऊस खूपच कमी पडल्यास भीषण परिस्थिती ओढवेल. अशी भीषण परिस्थिती ओढण्यापूर्वी मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.


सध्या पृथ्वीवर ९७.६ टक्के पाणी समुद्राच्या रूपाने आहे. तर केवळ २.४ टक्के गोड पाणी आहे. त्यातील फक्त पिण्यासाठी ०.५२टक्के एवढेच पाणी उपलब्ध आहे. निसर्गाचा ऱ्हास करण्याचे हे परिणाम आपल्याला भोगलेच पाहिजेत. काही वर्षापासून जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे व त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याचा साठा कमी होत चालला आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पाणी कपात करणे हे तात्पुरते उपाय आहेत. मुंबई महापालिका दीर्घकालीन नियोजनाऐवजी तात्पुरत्या उपायांना प्राधान्य देते. 


लोकसंख्येचा विचार केला असता पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. झोपडपट्ट्या आणि उंच टॉवर यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना बंधनकारक करणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहराला भविष्यातील धोका ओळखून समुद्राचे पाणी गोड करण्याचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली पाहिजे. पावसावर अवलंबून न राहता मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी समुद्री पाण्यातील क्षार काढून ते पाणी मुंबईकरांना पिण्यायोग्य करून पुरविणे गरजेचे आहे. आखाती देशातून समुद्राचे पाणी गोड करून वापरले जाते. त्याच धर्तीवर उशीर होण्यापुर्वीच आपल्याकडेही तसे प्रकल्प उभे करण्याची नितांत गरज आहे.



टिप्पणी पोस्ट करा

14 टिप्पण्या

  1. लेख छान लिहिला आहे. असेच लिहीत राहावे. आपले लेख वाचनीय तसेच अभ्यासू असतात. आपल्या लेखांमधून विविध विषयांची माहिती वाचावयास मिळते.

    उत्तर द्याहटवा
  2. छान लेख...

    खरंच भविष्यात परिस्थिती फारच भयंकर होणार आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. पाणीचोरी रोखल्यास पाणी बचत मोठया प्रमाणात होईल.

    उत्तर द्याहटवा
  4. छान लेख लिहिला आहे, उपयुक्त माहिती.

    उत्तर द्याहटवा
  5. पाणीचोरी सोबतच पाणीगळती सुद्धा रोखणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. पावसावर अवलंबून न राहता मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी समुद्री पाण्यातील क्षार काढून ते पाणी मुंबईकरांना पिण्यायोग्य करून पुरविणे गरजेचे आहे. 👌👌

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.