पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा गंध आला की आम्ही सारं विसरून मन प्रफुल्लित आनंदी होऊन जात होतो. आम्ही भावंडे पावसात मनसोक्त भिजायचो. कपडे ओले व्हायचे. पाय चिखल्याने माखायचे. घरात प्रवेश करताना एक आमचा वेगळाच अवतार अनुभवायला मिळायचा.
-दादासाहेब येंधे
वैशाखवणव्यात धरतीमाता तप्त झाली होती. सूर्य आग ओकत होता. कमाल तापमान म्हणजे काय, हे आता सर्वांना चांगलं कळून आलं होतं. पृथ्वीवरील जीवांचे मन घामाच्या धारांमुळे कोमेजून गेले होते आणि तेव्हाच आकाशात काळ्या गडद ढगांची चाहूल लागली. वारा घोंघावू लागला आणि वादळ सुरू होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. पहिला पाऊस... तहानलेली धारणीमाता पहिल्या पावसाने शांत झाली. मातीचा सुगंध धरणीमातेच्या उदरातून प्रसवू लागला. अशा पहिल्या पावसाचा आनंद घेताना आमचे मन सुखावून गेले. पावसाची अनेक रूपे बालपणी गावाला अनुभवलेली आहेत.

पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा गंध आला की आम्ही सारं विसरून मन प्रफुल्लित आनंदी होऊन जात होतो. आम्ही भावंडे पावसात मनसोक्त भिजायचो. कपडे ओले व्हायचे. पाय चिखल्याने माखायचे. घरात प्रवेश करताना एक आमचा वेगळाच अवतार अनुभवायला मिळायचा. मग आजीच्या ओरडा खावा लागायचा. मला आजही आठवते लहान असताना मुसळधार पाऊस आला. सोबत वादळही होते. आमचे शेतकरी कुटुंबातील कौलारू घर असल्यामुळे घरात पावसाचे प्रचंड तुषार उडायचे. कुठे लपावे कळायचे नाही. फुटलेल्या कौलांमधून ठीक ठिकाणी पाणी गळायचं. मग घरातली भांडी त्या ठिकाणी आम्ही ठेवत जायचो. वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने दरवाजातून पाणी आत मध्ये यायचे. घरातल्या मोठ्या माणसांसोबत आम्हा लहनांचीही पाणी भरण्यासाठी कसरत व्हायची. थेंब थेंब गळून भरलेल्या भांड्यातील पाणी टाकण्यासाठी धांदल उडायची. असं असलं तरी पाऊस उघडून गेला की बाहेरच्या वातावरणाने मन प्रफुल्लित व्हायचे. मग आम्ही सगळेजण कागदाच्या लहान लहान होड्या करून साठलेल्या पाण्यात सोडायचो.


आपल्या आठवणींच्या कुपीमध्ये बालपणीच्या अनेक आठवणी जपून ठेवलेल्या असतात. त्यामध्ये एका सवंगड्याचीही आठवण असते. तो सवंगडी म्हणजे पाऊस! आपण कितीही वाढलो तरिही, आठवणींमधला हा ओलावा कधी कमी होत नाही. वाढत्या वयासोबत आठवणीतला पाऊस मनाला नेहमी सुखावत राहतो.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.