अलीकडे पावसाळी पर्यटनासाठी गेलेले अनेक तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत. अति मद्य पिणे किंवा अति उत्साह या दोघांपैकी एक कोणते तरी कारण या दोन घटनांमध्ये असते. कारण, कोणतेही असले तरी तरुणांचा मृत्यू होणे यासारखी चटका देणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही.
-दादासाहेब येंधे
पावसाळा सुरू होताच नैसर्गिक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले धबधब्यांकडे वळतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले डोंगर, हिरवाईने नटलेली भात शेती, धुक्याने भरलेला घाट आणि भव्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. परिसरातील घाट रस्ते पावसाळ्यात निसर्ग प्रेमींना खुणावतात. मात्र, उधाणलेला समुद्र, निसरडे खडक आणि मुसळधार पावसामुळे या ठिकाणीही सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, दरवर्षी अशा ठिकाणी पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस येतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरणांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटकांना धबधब्यांवर येण्यास मज्जाव करतात.
पावसाला सुरुवात होतात पर्यटकांची पावले धबधबे धरणे तलाव आणि वाहत्या पाण्याच्या स्थळांकडे वळतात. मात्र, गेल्या काही वर्षातील जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक धबधब्यांवरील पर्यटकांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्त आणि पर्यटकांना इजा होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या केलेल्या उपयोजनाही अपयशी ठरत आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे, धरणे आणि तलाव पाण्याने तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी गर्दी वाढत आहे.
घरातून पर्यटनाला निघाल्या नंतर काही तरुण मंडळी दारूच्या दुकानातून मंडळाचा स्टॉक भरून घेतात आणि गाडीतच त्यांची पार्टी सुरू होते. वाहन चालक सोडला तर सगळेच पार्टीचा अनुभव घेत अगदी भिरभिरत एखादा धबधबा किंवा धबधब्यापासून जवळचा रिसॉर्ट निवडतात आणि तिथेच खरी पार्टी सुरू होते. जवळच्या रिसॉर्ट मध्ये उतरल्यानंतर जणू आपल्यावरची सगळी बंधने गळून पडल्यासारखी ही तरुण मंडळी हैदोस घालतात. दारू बरोबर बोलायला लागणारी ही मंडळी मग कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. पोटात अन्नाचे दोन घास जाऊ व न जावो पण दारूची नशा डोक्यात चढून बोलत असते. मग, धबधबा किंवा धरणात डुंबायलाही तयार होतात. पण, अशा अर्धवट तंद्रीत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर त्यातील काही मद्यपी तरुण वाहूनही जातात. मात्र, काही तरुण मंडळी निव्वळ पावसाचा आनंद घेण्यासाठी धरणाच्या पाण्यात डुबायला उतरतात. उत्साहाच्या भरात ते खोल पाण्यात जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. अलीकडे पावसाळी पर्यटनासाठी गेलेले अनेक तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत. अति मद्य पिणे किंवा अति उत्साह या दोघांपैकी एक कोणते तरी कारण या दोन घटनांमध्ये असते. कारण, कोणतेही असले तरी तरुणांचा मृत्यू होणे यासारखी चटका देणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. ज्या घरातील हे तरुण असतील त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळलेलाच असतो. ज्या तरुणांकडून घरच्यांकडून खूप काही अपेक्षा असतील असे तरुण एकाएकी जाणे हे त्यांच्या घरातल्यांबरोबर समाजाचेही नुकसान म्हणावे लागेल. म्हणून पावसाळी पर्यटनाचा विषय निघाल्यावर आपला मुलगा नेमका कोणत्या प्रवृत्तीच्या मुलांबरोबर जात आहे याची माहिती पालकांनी घेणे गरजेचे आहे.
पावसाळी पर्यटनाच्या पिकनिकच्या नावावर धांगडधिंगा घालणारे इतरांसाठी त्रासदायक ठरतात. निसर्गाचा आस्वाद घेताना निसर्गाला हानी पोहोचवणारे हे असं दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या तेथेच टाकून निसर्गाला विद्रूप करण्याचे काम देखील ही मंडळी करत असतात. असे करताना जर कोणी आढळले तर त्यांना त्याबद्दल जाब विचारला असता दारूच्या नशेत समोरच्या व्यक्तीला मारायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. काही तरुण दारूच्या नशेत दरीत कोसळून मृत्युमुखी पडतात. निसर्गाचा आस्वाद घ्यायला येणारे स्वतःचा आत्मनाश करून घेतात. निसर्ग निरपेक्ष भाव आणि उदार मनाने भरभरून देत आलेला आहे. त्याच्या चांगल्या रूपाचा आस्वाद घेऊन जगण्याचा उत्साह, आनंद परत घेऊन येणे हा पावसाळी पर्यटनाचा मुळ हेतू आहे. तरुणांनी उत्साह दाखवलाच पाहिजे पण अति उत्साहाचे भान ठेवणे गरजेचे आहे.
.



0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.