Ticker

10/recent/ticker-posts

स्त्री-पुरुष समानता ही काळाची गरज

-दादासाहेब येंधे

आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जी काही समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंतःकरण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते. आपल्या समाजात परंपरागत धारणांमुळे वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला धक्का वाटतो. मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली व स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे  हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते. 


यावरील उपायांची सुरुवात महिलांनी स्वतःपासून करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान का तुकविते. मुलांना घडविण्याचे काम महिलांच्या हातात असते. तिने ठरविले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते, मात्र त्यासाठी स्वतःच्या मनातून ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता पुसून टाकायला हवी. समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबरी नाही तर घरातील आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक निर्णय जे आतापर्यंत फक्त पुरुष घेत होता त्या सर्व निर्णयांमध्ये स्त्रीचा सहभाग असणे. नोकरी केली, पुरुषांच्या बरोबरीने सर्व कामे केली; त्यांच्यासारखे कपडे घातले, पार्टीत दारू, सिगारेटही घेतली म्हणजे समानता येत नाही. बहुतांशी पुरुषांना निर्णय घेताना 'मी किती शहाणा' हे दाखवून द्यायचे असते. पण स्त्रीच्या कर्तृत्वावरही त्यांनी विश्‍वास दाखविला पाहिजे. स्त्रियांनीही स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवावी. प्रत्येक अनुचित घटनेविरुद्ध मेणबत्त्या पेटतातच, पण असर नाही आणि प्रत्येक पीडितेला न्याय मिळतोच असे नाही. पुरुषी वर्चस्व कमी करायचं असेल तर आपली मूल्ये, संस्कार मुलांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. घरातील आजी-आजोबा मूल्याधारित  शिक्षणाचे उत्तम स्रोत असतात. त्यांनी ही जबाबदारी आवडीने घेतली पाहिजे. तसेच त्यांना ती घेऊ दिली पाहिजे. मुलांसह सबंध शाळा व समाज याच्याशी येतो. तिथे मुलांवर लोकशाहीनिष्ठ संस्कार केले जातात. स्वाभिमान, देशाभिमान, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता आदी मूल्यांची जोपासना फक्त शाळेत न होता ती समाजातूनही झाली पाहिजे.


ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असते. त्याचा उपयोग या संस्कारक्षम गटासाठी प्रभावीपणे केला पाहिजे. या संस्कारक्षम गटात ते उगवेल या उक्तीप्रमाणे चांगले संस्कारक्षम अनुभव मुलांना दिले पाहिजेत. विविध उपक्रम, नृत्य, पथनाट्य, सहली, विविध प्रकारच्या स्पर्धा यातून लोकशाहीमूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजेत.


स्त्री-पुरुष भेद नाहीसा करण्यासाठी शिक्षणातून प्रथम शिक्षकांचे व पालकांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन घडवून आणावे लागेल. शाळेत मुलगे-मुलींच्या वेगवेगळ्या याद्या करणे, मुलींना विशेष सवलती देणे याचाही विपरीत परिणाम होऊ शकतो. 'पुरुषी वर्चस्व' या शब्दांतूनच स्त्रियांची दुर्बलता चित्रित होते. घराघरातून कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचेच नाव असणे हे गृहीत धरलेले आहे. त्याऐवजी पुरुषाचे नाव त्याच्या पत्नीसमवेत संयुक्तपणे घेतले गेले, घरावर पती-पत्नी दोघांचे नाव लावले गेले तरी पुष्कळ फरक पडू शकेल. पुरुषांनी स्त्रीचं सामर्थ्य मान्य करायला हवे. सर्व क्षेत्रांतील जबाबदाऱ्या दोघांनी एकमेकांच्या विचारांनी सहकार्याने पार पाडाव्यात. आपापले 'इगो' बाजूला सारून एकमेकांना साथ देऊन तडजोडी करून कोटुंबिक, सामाजिक, आर्थिक सर्वच प्रश्न-समस्या सोडवाव्यात. प्रत्येक गोष्टीतील 'निर्णय' एकत्रित विचारांनी घ्यावेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या