दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने पंढरीची वाटचाल करतोय. त्यांच्यासोबत राज्याच्या इतर भागांतून विविध संताच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्यात. या वारीला एक हजार वर्षांची परंपरा आहे. सुरुवातीला वारकरी कोणतेही वाद्य न घेता वारी करत सोबत कोणाची तरी पालखी असे. तुकाराम महाराजांनी टाळ-मूदुंगांसह वारीत सहभागी होण्याची परंपरा सुरू केली. तशी ज्ञानेश्वरांच्या समाधीच्यावेळी नामदेवरायांनी पंढरपूरहून आळंदीला दिंडी नेली होती. ही दिंडीची सुरुवात म्हणावी लागेल. संत तुकाराम महाराजांच्या घराण्यातील १४ पिढ्यांपासून विठ्ठलभक्तीची परंपरा कायम राहिली आहे.
पंढरीची वारी, आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।
असे तुकाराम महाराज म्हणत. ते स्वतः ज्ञानेश्वरांच्या पादुका घेत आणि पंढरपूरची वारी करत. तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर तर त्यांचे चिरंजीव नारायण यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्ववर या दोघांच्याही पादुका पालखीत नेण्याची प्रथा सुरू केली. सोहळ्याला हैबतबाबांनी भव्य रूप दिलं. हा पालखी सोहळा अधिक उत्तम व्हावा, असा विचारत त्यांच्या मनात आला. त्यांनी सरदार शितोळे संस्थान तसेच अन्य काही संस्थाने, यांची मदत घेतली आणि पालखी सोहळा सुरू झाला. हा सोहळा लष्करी शिस्तीत पार पडू लागला.
आज अशाच राज्याच्या विविध भागांतून १०० ते १५० पालख्या पंढरपूरला जातात. या संपूर्ण सोहळ्यात लाखो वारकरी आपले देहभान विसरून सहभागी होतात. त्यांना या सोहळ्याची तसेच पांडुरंगाच्या भेटीची आत्मिक ओढ असते. काही घराण्यांमध्ये तर कुळधर्म कळाचाराप्रमाणे वारीची परंपरा चालत आली आहे. त्यामुळे घराण्यातील प्रत्येक पिढीतील किमान एका व्यक्तीने वारीला गेलेच पाहिजे, असा अलिखित नियम तयार झाला. त्यातूनच मग वारीची परंपरा सुरू राहिली आणि उत्तरोत्तर त्यासाठीची ओढही वाढत गेली. प्रतिकूल परिस्थितीतही वारीचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. जणू प्रतिकूलतेतून अनुकूलता शिकण्यासाठीच ही वारी असते.
वारीची ही शिकवण प्रत्येकानेच अनुसरण्यासारखी आहे. एरवी आपण काही पावले चाललो तरी थकल्यासारखे होते, मात्र, वारीच्या काळात टाळ-मृदूंगाच्या तालावर काही किलोमीटर चालूनही थकवा जाणवत नाही. वारीत जात्यावरील ओव्या, भारूड, अभंग, गवळण यासारख्या लोकगीत प्रकारांचा आवर्जून समावेश केला जातो. त्यातूनच मनोरंजनाबरोबर प्रबोधनही होते.
तुका म्हणे काही न मागो ।
आणिक तुझे पायी सुख सर्व आहे ।।
असं याचं वर्णन संतांनी अभंगांत करून ठेवलं आहे. कारण वारीला येणाऱ्या वारकऱ्याची कोणतीही आसक्ती नसते. त्याला कशाचीही अभिलाषा नसते. पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुखे साठली आहेत. एकादशीसाठी पंढरपुरात भक्तांचा महासागर लोटतो. अशा वेळी प्रत्येकाला पांडुरंगाच दर्शन घेण्याची संधी मिळतेच असं नाही, मात्र त्यांचं वाईट वाटून न घेता वारकरी विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन धन्यता मानतात. म्हणूनच त्याच्या चरणावर डोकं ठेवून मी धन्य होतो, अशी वर्षानुवर्षांची धारणा अजूनही कायम आहे. आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात भक्तांचा महासागर लोटतो. अशा वेळी प्रत्येकाला पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी मिळतेच असं नाही. मात्र, त्याचं वाईट वाटून न घेता वारकरी विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन धन्यता मानतात.
पंढरीच्या लोका, नाही अभिमान।
पाया पडे। एकमेका।।
वारी नैतिकतेचे चालते बोलते विद्यापीठच आहे. मुखाने अखंड हरिनामाचा गजर आणि उरी विठ्ठलभेटीची आस घेऊन ही वाटचाल होत राहते. वारीतील वारकरी एकमेकांचे दर्शन घेतात. यावेळी त्यांच्यातील लीनतेचा प्रत्यय येतो. शिवाय वारीहून आलेल्या व्यक्तीचं दर्शन घेण्याचीही प्रथा आहे. एकूणच भक्तीभाव, संशोधन, योग्य व्यवस्थापन, अर्थकारण आणि सामाजिक तत्त्वचिंतन अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्त असलेला हा सोहळा म्हणजेच संतांनी जगाला दिलेली एक देणगीच म्हणावी लागेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.