Ticker

10/recent/ticker-posts

सोशल मीडियातील वाढत्या धोक्यांपासून सावध राहा

 प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने  करणे गरजेचे

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

भारतात स्वस्त झालेल्या इंटरनेट सुविधेमुळे तरुण-तरुणींमध्ये समाज माध्यमांच्या वापराची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेसबुक आणि व्हॉट्सऍप जणू तरुणाईचा श्वास झाला आहे. फेसबुक, व्हाट्सअप, मेसेजेस, ट्विटर यासारख्या मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर तो उत्तमच आहे. पण सर्वजण या मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करतातच असे दिसत नाही. समाजातील विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या माध्यमांचा वापर तरुणी आणि महिलांची फसवणूक करण्याकरताच अधिक वापरत असल्याचे मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. फेसबुकवर तर अल्पवयीन मुलींशी मैत्री करून ओळख वाढवून त्यांचे अश्लील फोटो तयार करून बाहेर काढण्याची धमकी देत तिला भेटायला बोलावले जाण्याच्या घटना उघडकीस येत आहेत.


एका घटनेत तर फेसबुकवर मैत्री करून आपण मोठा व्यापारी व पैसेवाला असल्याचे भासवून एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून लग्नाला नकार दिला. तरुणीने जेव्हा गावात त्याचा शोध घेतला, तेव्हा तो मोठा व्यापारी- व्यावसायिक नाही, तर एक सलुन दुकानदार होता. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर सलून चालक आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले.


समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे गुन्हेगारही तेवढ्याच गतीने वाढत चालले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणापुढेदेखील माध्यमांतील गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.  बदनामी, अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोषींना तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. या कायद्याची जनजागृती समाजात होणे गरजेचे आहे.


फेसबुकवर अनेक खाती बनावट नावाने असतात. त्यामुळे विश्वासार्ह आणि आधीच ओळख, परिचय असलेल्या व्यक्तीच्या खात्यावर माहिती शेअर केली पाहिजे. अनोळखी व्यक्तीकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अनोळखी व्यक्तींशी झालेल्या मैत्रीतूनच फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. बलात्कार आणि अत्याचारासोबतच आर्थिक फसवणूक होऊ शकते. कार्यालयीन कामाचे ठिकाण असो की ऑफिस कामाचे निमित्त काढून फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून महिलांना छळण्याचे प्रकारही होत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे चॅटींगचा स्क्रीनशॉट काढून ठेवत पोलिसांत तक्रार केल्यास संबंधितांविरुद्ध पुराव्यासह गुन्हा दाखल होऊ शकतो. समाज माध्यम संपर्क, समन्वय आणि संवादासाठी प्रभावी माध्यम असले तरी त्याचा गैरवापर करणारे गुन्हेगारही तेवढेच वाढले आहेत.


किमान आपण कोणाला मानसिक आधार देऊ शकत नसू तर आपल्यामुळे कोणाला मनस्ताप होईल अशी कृत्य टाळणे आवश्यक आहे. कधी कधी जिवंत व्यक्तीलाही श्रद्धांजली वाहण्यात येते. एकाने वाहिलेली पाहून सगळेजण तीच कृती करतात. कुणी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.  सोशल मीडियावरील काहीजणांचा क्रोध संताप व्यक्त करण्यासाठी केलेल्या पोस्टमधून विकृत मानसिकतेचे दर्शन होत असतं आपल्या प्रसारित होत असलेल्या संदेशमुळे नकळतपणे आपण विकृतीचा भाग बनतो याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, तरच अशा प्रकाराला आळा बसेल. यापूर्वीसुद्धा जातीय धार्मिक भावना भडकविण्याचा, समाजमन कलुषित करणाऱ्या,  तत्सम अफवा पेरण्याचं काम समाज माध्यमांवर झालं आहे. आपल्या संदेशामुळे नकळत कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ नये याचे किमान भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.


सोशल मीडियामुळे प्रत्येक सामान्य माणूसही  पत्रकारांची भूमिका बजावू लागला आहे; पण त्याचवेळी सोशल मीडियामुळे आणि फेक न्युजचे आवाहनही संपूर्ण जगासमोर उभे ठाकले आहे. सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात प्रबोधनात्मक संदेश येत असतात. सर्वत्र नवे प्रबोधन पर्व उतरल्यासारखे वाटते. आपण शहाणे झालो आहोत आणि अवघ्या जगाला शहाणे करून सोडविणे आपलेच कर्तव्य आहे. या भावनेतून बरेच महानुभव आलेला प्रत्येक मेसेज शक्य तेवढ्या मित्रांना आणि ग्रुपवर अग्रघोषित करत असतात. त्यात पुन्हा सबसे तेज फक्त असल्याचे मिळवायचे असते. त्यातून आपण फेक न्युजचा फैलाव करत आहोत याचे त्यांना पुसटशीही कल्पना नसते. असा साधा विचारही त्यांना शिवत नाही. आपण साऱ्या जगाची चिंता वाहत असल्याच्या भ्रमात हे चिंतातूर असतात. 


मुख्य प्रवाहातील पत्रकारिता म्हणजे 'द्वारपाल' सिद्धांतावर चालते. वार्ताहर बातमी देतो, उपसंपादक वृत्तसंपादक आणि संपादक द्वारपाल यांची भूमिका निभावतात. सोशल मीडियात द्वारपाल नावाची संकल्पनाच नाही. आणि शक्यही दिसत नाही. म्हणूनच काहीही पुढे ढकलले जाते यावर कुठेतरी अंकुश असणे गरजेचे आहे. समाज माध्यम जेवढे प्रभावी तेवढेच ते धोक्याचेही आहे. हे ओळखून प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक आहे. 



 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या