या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. भावाच्या भरभराटीसाठी मनोभावी प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देऊन तिचं रक्षण करण्याचे वचन देतो.
-दादासाहेब येंधे
ओवाळीते भाऊराया..
वेड्या बहिणीची ही वेडी माया..."
वाचताना या ओळी जरी साध्या वाटत असल्या तरी, भावा-बहिणीच्या नात्यामधलं हे प्रेम यातून अधोरेखित होते.
श्रावण पौर्णिमेला सर्वत्र मोठ्या आनंदात रक्षाबंधन हा सण सर्वत्र साजरा करण्यात येतो. संपूर्ण भारतभर रक्षाबंधन सण साजरा होतो. भारतभर जरी वेगवेगळ्या नावांनी रक्षाबंधन सण साजरा होत असला, तरी त्यामागील भावना एकच आहे. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन सण होय. लहानपणी भावा बहिणींमध्ये कितीही रुसवे फुगवे, मारामाऱ्या आणि अबोले असले तरीही ते एकमेकांना समजून घेतात आणि तितक्याच प्रेमाने जपतातही. घरात कितीही भांडले तरी, घराबाहेर मात्र हे भाऊ-बहीण एकमेकांना प्रेमाने सांभाळून घेतात.
श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा समुद्राच्या काठावर राहणारे कोळी बांधव हा सण प्रामुख्याने साजरा करतात. वर्षा ऋतूत समुद्र खवळलेला असतो आणि सागरी प्राण्यांच्या प्रजननासाठी हा उत्तम कालावधी मानला जातो. त्यामुळे कोळी बांधव मासेमारीसाठी बोटी समुद्रात येऊन जात नाहीत. नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरतो आणि खवळलेला समुद्र शांत होतो. यानंतर कोळी बांधव मासेमारी करण्यास सुरुवात करतात. समुद्र शांत व्हावा त्याचा खूप त्रास नये जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी ते देवाला प्रार्थना करतात. कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ देतात आणि नारळाचे गोड गोड पदार्थ बनवतात.
या पौर्णिमेस राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. भावाच्या भरभराटीसाठी मनोभावी प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेट वसु देऊन तिचं रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाविषयी अनेक पारंपारिक कथा प्रचलित आहेत. पाताळ्यातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपलं भाऊ केलं आणि नारायणाची सुटका केली म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केले जाते असे म्हटले जाते.
तर मध्यमयुगीन भारतात बाहेरील आक्रमणांपासून महिलांचा संरक्षण करण्यासाठी हा सण साजरा केला जात होता. तेव्हापासून भावाच्या हातावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृती सुरुवात झाली असेही म्हटले जाते.
श्रावण महिना म्हणजे सण उत्सवांची रेल असेल त्यात पौर्णिमेला येणाऱ्या रक्षाबंधनाचा सण म्हणजे मध्यवर्ती समतोल राखण्यासाठी या दिवशी रक्षाबंधन साजरी केली जाते. बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येते. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.
महिला या दिवशी दारात सुंदर रांगोळी काढतात. घरही सणासाठी नीटनेटके सजवतात. या सणाच्या दिवशी घरात गोड-धोड जेवण करतात. काही ठिकाणी पुरणपोळ्या बनवतात, कोणी गुलाबजाम बनवतात तर काहीजण पुरी-भाजी किंवा श्रीखंड-पुरी बनवतात. रक्षाबंधन दिवशी वेगवेगळ्या पंच-पक्वानाची मैफिलच असते जणू.
महिला व मुली नवीन साड्या नेसून किंवा ड्रेस घालून सुंदर तयार होतात. नेहमी कामाच्या घाई गडबडीत असणारया स्त्रिया सणा दिवशी मात्र पारंपारिक वेषात तयार होतात. भरजरी साड्या, दागिने, केसांचा आंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा अशा पारंपारिक साजात स्त्रिया तयार होतात. तसेच पुरुष वर्गही पारंपारिक वेषात तयार होतात.
रक्षाबंधणासाठी घरात पाट मांडून, त्या भोवती पानाफुलांची सुंदर रांगोळी काढतात. औक्षणासाठी आरतीचे ताट तयार करतात. घरात देखील फुलांची छान आरास करतात. औक्षणाची सर्व तयारी झाल्यावर पहिली राखी आधी देवघरातील देवांना बांधतात, आणि त्यांचे औक्षण करून त्यांना नैवैद्य दाखवतात.
असा घरातील रक्षाबंधन साजरा करतात- लाडक्या भाऊरायाला पाटावर बसवतात. भावाच्या कपाळावर टिळा लावतात, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात, त्याचे औक्षण करून, त्याला नमस्कार करतात आणि मग गोड खायला देतात.
आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभावे, त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्याला उत्तम यश मिळावे, अशी प्रार्थना बहिण आपल्या लाडक्या भावासाठी करते, भाऊही यावेळी आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो. तसेच आपल्या लाडक्या बहिणीला छान भेटवस्तूही देतो.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.