Ticker

10/recent/ticker-posts

समजून घेणं महत्त्वाचं

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

चांगला जोडीदार मिळाला की आयुष्याची नौका सुरळीत चालते. त्यामुळे जोडीदार निवडीचा निर्णय हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो.  घाईघाईत घेतलेला  किंवा इतरांच्या सल्ल्याने घेतलेला निर्णय अनेकदा पश्चाताप करायला लावणारा ठरू शकतो. अशावेळी भविष्यात या निर्णयावरून इतरांना दोष देण्यापेक्षा जोडीदार निवडताना नेहमी प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. यासाठी विवाहापूर्वी काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक ठरते.

जबाबदाऱ्यांची जाणीव : सर्वप्रथम लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी मुलगा-मुलगी दोघांनाही जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. कधी-कधी लग्नाचे वय झाल्यामुळे किंवा घरच्यांच्या आग्रहाखातर लग्नाचा निर्णय घेतला जातो. परिणामी, जबाबदाऱ्यांची जाणीव नसल्यामुळे लग्नानंतर अडचणींना सामोरे जावे लागते.

स्पष्टपणा : जोडीदार निवडताना सर्वात महत्त्वाचा असतो तो परस्परांतील सुसंवाद. स्पष्टपणा आणि समजूतदारपणा. जोडीदारांची ओळख झाल्यानंतर एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे परस्परांच्या स्वभावाची आवडीनिवडीची ओळख होण्यास मदत होते. या गोष्टी कळल्या की परस्परांना समजून घेणे सोपे जाते. अनेकदा जोडीदार म्हणून एकमेकांना पसंती दर्शवल्यानंतर होणाऱ्या भेटीगाठी, गप्पा- गोष्टींमध्ये केवळ समोरच्याची स्तुती करण्यासाठी किंवा मन जिंकण्यासाठी लग्नानंतर त्याच गोष्टी नकोशा वाटतात. त्यातूनच मग वादविवादाचे प्रसंग उद्धभवतात. त्यामुळे विवाहापूर्वीच जे सत्य आहे ते स्पष्ट करणे आवश्यक आहे.

कमी लेखू नका : आपल्या स्टेटसबद्दल वारंवार बोलून जोडीदाराला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. दोघांनाही आयुष्याचा पुढचा प्रवास एकत्रितपणे करायचा आहे हे लक्षात ठेवून स्वाभिमान बाजूला ठेवून सामंजस्य दाखवलं तर एकमेकांचे स्वभाव पटकन समजतील आणि निर्णय घेणे सोपे जाईल.

अर्थकारण : लग्नानंतरचं आयुष्य सुखकर होण्यासाठी उत्पन्न हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे जोडीदाराच्या उत्पन्नाबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्याची वेळ आल्यास आवश्यक असणाऱ्या आर्थिक तरतुदींबाबतही माहिती घेणे गरजेचे आहे.

आरोग्य : एकमेकांच्या इतर आवडी-निवडी प्रमाणे एकमेकांच्या आरोग्याविषयी जाणून घ्यावे. बरेचदा मुलगा किंवा मुलीला गंभीर आजार आहे. हे लग्नानंतर समजते. अशा वेळी नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे लग्नापूर्वीच एकमेकांच्या आरोग्याबाबत मनमोकळी चर्चा होणे गरजेचे आहे. अलीकडे, लग्न करण्यापूर्वी रक्त तपासणी केली जाते. अनेकजण ही गोष्ट अपमानास्पद मानतात. पण, भविष्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे विवाहापूर्वी पत्रिका बघून 'गुणमिलन' पाहिलं जातं आणि ते झाले की, लग्नाची बोलणी पुढे केली जातात. मात्र बरेचदा पत्रिकेतील गुण जुळुनही वैवाहिक जीवन  सुखकर होतं असं नाही.  त्यामुळे त्या गुणांसोबत मनोमिलन होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे परस्परांना एकमेकांना जाणून घेणे.




टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.